Monday, January 16, 2006

दळणवळणाची साधने - बस

दळणवळणाच्या साधनांशी माझी पहिली भेट कधी झाली हे नक्की आठवत नाही. पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या ना त्या कारणाने भेट होतच राहिली. बसपासून बोटीपर्यंत आणि "वडाप"पासून विमानापर्यंत निरनिराळ्या रूपात आणि धावत्या, तरंगत्या, उडत्या अशा निरनिराळ्या अवस्थेत गाठभेटी होतच राहिल्या

सर्वात पहिल्यांदा आयुष्यात आली ती 'बस'. लहानपणी, कर्नाटकाने बळकावलेल्या मराठी भागात आमचे वास्तव्य होते. बरेचसे सगेसोयरे महाराष्ट्रात, त्यामुळे खूपदा आंतरराज्य प्रवास करावा लागत असे. तेंव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र असे बसचे दोन पर्याय असत. कर्नाटक एष्टीला वेगमर्यादेचे बंधन नसल्याने ते गाड्या सुसाट पळवीत. शिवाय गाडीच्या आतला फिकट पोपटी रंग पाहून मळमळायला होत नसे. खिडक्याही पुढे-मागे सरकवायच्या असत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या गाड्यांमध्ये ड्रायवरला जाळीच्या पिंजऱ्यात कोंडलेले नसे, त्यामुळे थेट ड्रायवरच्या शेजारी बसून गाड्यांचा पाठशिवणीचा खेळ अगदी जवळून बघता येत असे. याउलट महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या गाड्यांच्या गळ्यात वेगमर्यादेचे लोढणे असायचे. आतला गडद हिरवा रंग नकोसा वाटायचा. औरंगजेबाचे हिरवे मोगली सैन्य जसे "दीन दीन" करत बालशिवाजींवर चालून जायचे तसे ते गडद हिरवटलेले वातावरण आम्हा मावळ्यांवर चालून यायचे. खिडक्याही उघडण्यासाठी वर सरकवाव्या लागत आणि वर गेलेल्या खिडक्या वरच राहाव्यात यासाठी त्या खिडक्यांचे वजन न पेलवणाऱ्या दोन छोट्या पट्ट्या असत. फार काळ तग धरणे त्यांना मानवत नसे. शिवाय रस्ताही असा चावट की त्याच्या गुदगुल्यांनी बस अगदी खळखळून हसायची, त्यामुळे त्या चुकार पट्ट्यांना आयतेच निमित्त मिळून, बालगणेशाने जसे रावणाने धरायला दिलेले शिवआत्मलिंग जड झाल्याने खाली सोडून दिले, तसे त्यांना सांभाळायला दिलेले खिडकीचे तावदान खाली यायचे. एखादा बेसावध उतारू खिडकीत हात ठेवून बसला असेल तर झालेच, बिचाऱ्याचा शाइस्तेखान व्हायचा.

जाणाऱ्या गाड्यांची पाठवणी, येणाऱ्या गाड्यांचे स्वागत आणि काही गाड्यांना रात्रभर आसरा देण्याचे महत्त्वपूर्ण काम बसस्थानक करत असते. बसस्थानकाइतके विहंगम दृश्य खचितच कुठले असेल. कित्येक तास काहीही न करता बसस्थानकावर घालवता येतील इतकी विविधता आणि करमणूक तिथे असते. जात-पात, धर्म, सामाजिक, आर्थिक विषमता अशी सर्व बंधने नाहीशी होऊन एकसंध समाजाचे रंगीबेरंगी चित्रच जणू तिथे उमटलेले असते. "काळजी घे", "सांभाळून राहा", "पोचल्यावर फोन कर" पासून "तुझ्याशिवाय करमणार नाही" इथपर्यंत निरनिराळे सूर उमटत असतात. कुठे तंबाखूची देवाणघेवाण करत जानुमा, पांडबा, मल्हारी यांचा परिसंवाद चालू असतो, कुठे कामाला निघालेले पांढरेपेशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर, फुकटचीच, पण चर्चा करत असतात, महिलामंडळात नवीन पाककृतींपासून काल मालिकेत काय झाले, ह्याने/तिने असे करायला नको होते वगैरे चर्चा होत असते मधूनच चहाड्यांची देवाणघेवाणही सुरू असते, कुठे महाविद्यालयीन पाखरांचा किलबिलाट सुरू असतो, कुठे नुकत्याच आलेल्या गाडीभोवती फेरीवाल्यांची गर्दी झालेली असते आणि त्यासर्व पसाऱ्यापासून अलिप्त अशी खाकी गणवेशधारी मंडळी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे आपले काम करत असतात.

बसप्रवास बहुतेकवेळा दोन, तीन तासांचाच पण वैशिष्ट्य असे की गाडी सुरू होताच काही मिनिटातच झोप येण्यास सुरुवात होते. कितीही झोप झालेली असो, कितीही कप चहा घेतलेला असो, झोप चष्म्यांमधून, वर्तमानपत्रांआडून, शेंगदाणे/फुटाणे चुकवीत आपल्या डोळ्यात येतेच. आपल्याला तीस चाळीस लोकांसह एका मोठ्या पाळण्यात घालून ड्रायवर झोके देतोय आणि कंडक्टर "तिकिट तिकिट", "हांऽऽ इकडे कोण तिकिटाचे?" किंवा "याऽऽर इल्लेऽऽऽ?" का आणखी काही अंडुगंडू भाषेत अंगाई गातोय आणि त्याचबरोबर आपल्या हातातील खेळण्याने "टिक् टिक् टिक् टिक्" असा आवाजही करतोय असे एकंदर जागे राहण्यास कठीण वातावरण असते.

प्रवास दूरचा आणि रात्रीचा असेल तर विचारू नका. सहप्रवासी, आता पंधरा दिवस मुक्काम बसमध्येच अश्या जय्यत तयारीनिशी आलेले असतात. कानटोप्या, स्वेटर, शाली आणि कधीकधी उशीदेखील! शिवाय बहुतेकांनी आपले जेवणही बरोबर आणलेले असते. कुठे मम्मी, पप्पा आपापल्या पिंकी, बंटीबरोबर प्लॅस्टिकच्या डब्यांतून चमच्याने काही खात असतात, तर कुठे भागामावशी आपल्या अंत्या आणि गंगीबरोबर झुणकाभाकर खात असते. खाद्यपदार्थात मुख्यत्वे कोरडे पिठले, कांदा बटाट्याची सुकी भाजी, लसणाची किंवा नुसती शेंगदाण्याची चटणी आणि पोळी किंवा भाकरी, गुजराती कुटुंब असेल तर दशमी, खाकरा, लोणची आणि बारा भानगडी. जिकडे पाहावे तिकडे मंडळी मस्त मांडी घालून बसून चवीने खात असतात. आपण अगदी पोटभर जेवून घरातून बाहेर पडलेले असतो, "आणखी थोडी खीर देऊ का?" किंवा "शेवटी थोडा दहीभात तरी खायचा होतास" असे आईचे वात्सल्य उतू जात असते, आपण मात्र "नाही बुवा, आता पाणी प्यायला सुद्धा पोटात जागा नाही" असे म्हणून उठतो. इतके होऊनही गाडीत सुटलेल्या घमघमाटाने, नाही म्हटले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतेच.

खाण्याचा कार्यक्रम संपल्यावर पाण्याच्या बाटल्यांची देवाणघेवाण सुरू होते. मंडळी भरपेट खाऊन वर पाणी पिऊन मस्त ढेकर देत असतात. आपण मात्र खारे शेंगदाणे किंवा लिमलेटच्या गोळ्या चघळून, तोंडाला सुटलेले पाणी कसेबसे गिळत असतो. खाद्यमेळ्यानंतर मंडळींना झोपायचे वेध लागतात. मग अंत्या, बंटी असे पौगंडावस्थेतील वीर उभे राहून वळचणीला कोंबलेल्या पिशव्या आणि बॅग्ज उपसतात. "चालत्या बसमध्ये उभे राहून मी पिशवी काढली" आणि "माझा हात वरपर्यंत पोहोचतो" याचे त्यांना भारीच कौतुक असते. स्वेटर, कानटोप्या आणि शाली बाहेर निघून आपापल्या जागी ड्यूटीवर जातात. लहान मुले आईच्या मांडीवर आणि ज्येष्ठ मंडळी शेजाऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून निद्रादेवीची आराधना करू लागतात. बसमधले दिवेही खास प्रवाशांच्या झोपेत अडथळा येऊ नये, किंबहुना झोप येण्यास सहाय्यक व्हावेत असेच असतात. गडद हिरवा, गडद निळा वगैरे रंगात, रंगाऱ्याला मोबदला न देता रंगवून घेतल्यासारखे ते असतात. त्यांच्यामुळे एकूणच झोपेस पोषक अशी वातावरणनिर्मिती होते.

काही वेळाने कंडक्टर आपले हिशोबाचे संपवून पुन्हा एकदा गाडीतले उतारू मोजून घेतो. सगळे झाल्यावर घंटी वाजवून किंवा कर्नाटकाच्या गाडीत दोनवेळा शिटी वाजवून ड्रायवरला "मालवून टाक दीप" असा संदेश देतो. ड्रायवरही एकदा मागे नजर टाकून सर्व दिवे मालवून टाकतो. गाडीचा एकसुरी आवाज आणि सहप्रवाशांचे घोरण्याचे बहुसुरी आवाज एकत्र येऊन एक वेगळाच माहौल बनलेला असतो आणि "म्हैस" मध्ये पुलंनी म्हटल्याप्रमाणे त्या झोपी गेलेल्या गाडीत ड्रायवरला सोबत म्हणून फक्त आपण जागे असतो.

शशांक जोशी

यासारखेच दळणवळणाची साधने - सिटीबस

This article was first published on www.manogat.com and can be seen here

Get the PDF file of this article.

.

3 Comments:

At 10:35 AM, Anonymous Anonymous said...

chhan chhan chhan
tuze blogs kiti chaan

panduhi chhan, bus-hi chhat
kacheri kiti chaan...

shashu....navin kahitari lihi na!
aattaparyant tuze sagLa stuff 4-5 veLa vachla....

 
At 10:39 AM, Anonymous Anonymous said...

mala mahit aahe tula asla 'faltupana' ajibaat aawdat nasel.....malahi nahi aawdat....but sometimes the child inside me dominates my maturity....aani ase tevha hote jevha mi atishal aanandi aste.....tuzha lekhnaane aanad zala.....mhanun tuza krutaghnapane chhal kartiye.....feeling very guilty....still chhaan chhaan tuze blogs kiti chhan :p

 
At 10:40 PM, Anonymous Anonymous said...

hi
maze hi gav maharashtra-karnatak seemevar asalyamule mihi donhi ST madhun pravas kela ahe ani he sagale anubhav ghetale ahe. Pan lahan asatana. sagal dolyasamor hubehub ubhe rahile (Specially Khidakicha anubhav). ata gavakade janech hot nahi. lagnanantar tar nahich. pan khup chhan vatal vachun.

Prachi Tipare

 

Post a Comment

<< Home