Friday, February 23, 2024

कंपने, स्पंदने, लहरी आणि चहाचे आयुर्वेदिक विवेचन

 "बघा बघा, चिनी, जपानी आणि अमेरिकेच्या लोकांना शाकाहारी भारतीय संस्कृतीचे महत्त्व आता कळू लागले आहे."

"सगळे भारतीय लोक शाकाहारी असतात म्हणून कोणी सांगितले तुम्हाला? व्हायरसला कसे कळते समोरचा माणूस काय खातो?"

"शाकाहार सत्त्वगुणी आणि मांसाहार तमोगुणी असतो. शाकाहारातून निघणाऱ्या स्पंदनांतून आणि कंपनांतून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. हा सगळा कंपनांचा/स्पंदनांचा खेळ आहे"

"नेमकी कशाची स्पंदने आणि कशाची कंपने?"

"अहो हीच तर मोठी गंमत आहे. ऊर्जेची स्पंदने आणि कंपने. जश्या ओंकारातून आणि घंटानादातून लहरी निघतात तसेच."

"आता या लहरी कोठून आल्या?"

"सोपं आहे. एका तांब्याच्या स्वच्छ पेल्यात ताजे गोमूत्र भरून घ्या. त्यात हळूच एक बोट बुडवून काढा. काय दिसेल तुम्हाला पेल्यात?"

"गोमूत्र!"

"ते तर आहेच हो. पण गोमूत्रात दिसतील तरंग, म्हणजे लहरी. गोमूत्र, शेणाचा सडा, तुळशीचे रोप, कापूर आरती ... हा सगळा लहरींचा खेळ आहे." 

"मगाशी तर म्हणालात कंपनांचा/स्पंदनांचा खेळ आहे?" 

“अहो हे सगळे एकच. हे सगळे ओढे/नाले नदीला मिळतात. नदी समुद्राला जाऊन मिळते. आणि समुद्रात काय असतात? लाटा, म्हणजे लहरी!”

.. 

आजकाल कोणत्याही पदार्थांविषयी परस्परविरोधी सल्ले मिळतात, चहा प्यावा की पिऊ नये याविषयी गोंधळात पडलेल्या एका मित्रासाठी केलेले हे आयुर्वेदिक विवेचन  ....


दुधाने कफ वाढतो (+१क)

आल्याच्या गराने पित्त कमी होते (-१पि)

आल्याच्या सालीने वात वाढतो (+१वा)

चहामुळे पित्त वाढते (+१पि)

साखरेमुळे कफ पातळ होतो (खोकल्यावर खडीसाखर खातात) (-१क)

अग्नीच्या संपर्काने पदार्थ हलका होतो, म्हणजे वात कमी होतो (-१वा)

आता हे सगळे एकत्र केल्यास 

+१क-१पि+१वा+१पि-१क-१वा = 0 

काही घंटा होत नाही, पी तू बिनधास्त 

..

0 Comments:

Post a Comment

<< Home