Sunday, March 12, 2006

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग २

या आधी माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १

माझ्या साहित्यप्रवासाच्या पहिल्या प्रयत्नात जोरदार अपयश आले होते. असे असले तरी, झाल्या प्रकाराने खचून जायचे नाही, साहित्याची सेवा करताना जीव गेला तरी बेहत्तर, काहीही झाले तरी साहित्यसाधना सोडायची नाही, अशा क्रांतिकारी विचारांनी मन भरून गेले. लेखक व्हायचा निर्णय घेतला खरा पण आता पुढे कसे जायचे. इथे पुन्हा माझा छंद कामी आला. अपयश आल्यावर मोठी माणसे काय करतात? निवडणुकीत पडल्यावर नेतेमंडळी, "हा अनीतीचा नीतीवर विजय आहे. ज्यांच्यासाठी आम्ही आमचे घरदार विसरून दिवसरात्र झटलो त्यांना धनदांडग्यांचा 'हात' धरावासा वाटतो? लोकांची सारासारविवेकबुद्धी वाढण्याची गरज आहे", असे विश्लेषण करतात. समीक्षकहृदयसम्राट साहित्यिक, फसलेल्या प्रयत्नांना, "नवा प्रयोग होता, वाचकांची वैचारिक पातळी अजून वाढायला हवी" असे म्हणतात. बिचाऱ्या वैज्ञानिकांना मात्र अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता येत नाही. ते अपयशाचे शास्त्रीय आणि गणिती पद्धतीने विश्लेषण करतात. मी ही ठरवले आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढची पावले टाकायची.

मी झटून कामाला लागलो. मिळतील तेथून आणि मिळतील ती पुस्तके जमा केली. अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, नाटके यांचा अक्षरशः वाळवीप्रमाणे फडशा पाडला. असंख्य निरीक्षणे, परीक्षणे आणि समीक्षा वाचल्या. त्यातून गद्य लेखनात असणारे निरनिराळे उप-प्रकार लक्षात आले. ऐतिहासिक, भावनात्मक, रहस्यमय, कौटुंबिक ... यादी बरीच लांब होत होती. अशी लांब यादी पाहता, मारुतीची वाढलेली शेपटी पाहून रावणाची कशी अवस्था झाली असेल याचा अंदाज आला. शेपटीला आग लावण्याची आज्ञा रावणाने का बरे दिली असावी हे ही समजले.

"एकावेळी पूर्ण यादी न पाहता केवळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे", थोडक्यात, मोगल, निजाम आणि अदिलशहा या सर्वांना एकदम न डिवचता, एकावेळी एकेकाचा निकाल लावावा असा गनिमी कावा करायचे ठरवले. पण ऐतिहासिक लिखाणाला लागणारे कठीण संशोधनकार्य जमेल की नाही शंकाच होती शिवाय इतिहासाबाबत समाज खूपच संवेदनशील असल्यामुळे चुकून आपल्या लिखाणामुळे कुणाच्या भावना दुखावल्या तर घरात तोडफोड व्हायची. त्यामुळे "माझ्या हातून ऐतिहासिक लिखाण होऊ नये ही श्रींची इच्छा" असा विचार करून मी तो विचार सोडून दिला.

भावनात्मक लिखाण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे मात्र कळत नव्हते. सर्व प्रकारच्या लेखकांमध्ये भावनात्मक लेखन करणाऱ्यांचे स्थान सर्वात वरचे. त्यातही पुन्हा दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कथानक अगदी गोडधोड असते. यातली सगळीच पात्रे सत्ययुगातून किंवा देवलोकातून आल्यासारखी असतात. एकमेकांविषयी प्रेम अगदी ऊतु जात असते. अशा कथांमध्ये घोड्याएवढ्या वाढलेल्या मुलाला आई, "बबडू", "शोनू" अशा हाका मारते. कर्ता, कर्म, क्रियापद सगळ्यांचा 'लडिवाळ अपभ्रंश' केलेला असतो. प्रत्येक वाक्य पूर्णविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्हाने संपते. अशा कथा वाचताना सर्वसामान्य वाचकांचा चेहरा, अतिशय आंबट चिंच खाल्ल्यावर किंवा गाढ झोपेतून एखाद्याला उठवून त्याच्या तोंडावर विजेरीचा प्रकाशझोत टाकल्यावर जसा दिसेल अगदी तसा होतो. पुन्हा या गोडधोडाच्या पंगतीत विनोदाची फोडणी देण्याचा केविलवाणा प्रयत्नही असतो. अर्थात तो वाचून कोणालाही हसू येत नाही ही गोष्ट निराळी. असले एक पुस्तक एकदा वाचायला घेतले, पहिल्या १/२ पानातच मळमळायला लागले. "डोक्याला मुंग्या येणे" हा शब्दप्रयोग, अशीच एखादी कथा वाचून झीट आलेल्या कोण्या बिचाऱ्याने रूढ केला असावा. मुंग्याच त्या, गोड काही दिसले की येणारच. असला प्रकार जर आपल्याला धड वाचता येत नाही मग लिहिणे दूरच.

दुसरा प्रकार पहिल्याच्या अगदी उलटा. या प्रकारच्या कथा थोड्या गंभीर ढंगाच्या असतात. "भावनांचा सुंदर आविष्कार", "उत्कट, भावनाप्रधान लेखन", "मनातील तरल भावांचे चित्रण" अशा परीक्षणाने गौरवलेली अशी गंभीर पुस्तके वाचून, मी हसून गडबडा लोळत असे. पण मान्यवर लोक मात्र अतिशय गंभीर चेहऱ्याने त्यावर दोन दोन दिवस चर्चासत्रे चालवतात, समीक्षक लोक अगम्य भाषेत मूळ पुस्तकाच्या लांबीइतकी समीक्षा लिहितात. "एका लहान मुलाने बाहेर पावसात भिजणारे कुत्र्याचे पिलू उचलून घरात आणले" ही एका ओळीची कथा ३०/४० पानात अतिशय रटाळ पद्धतीने सांगितली असते. यांच्या कथेतील प्रत्येक पात्र हे "आनंद" मधल्या राजेश खन्नाच्या पात्रापेक्षा हजारपट भावनाप्रधान असते. आजी, आजोबा, आई, वडील, मुलगा, मुलगी, मित्र-मैत्रिणी यांच्यात असणारे संबंध विनाकारण ताणलेले असतात. यातले कोणतेही पात्र समाधानी किंवा आनंदी नसते. एक अतिशय भावनाप्रधान म्हणून नावाजलेली कथा मी वाचायला घेतली. कथेचे नाव होते "हेमाची काकू". कथेचे सूत्र थोडक्यात असे, "लहान असताना हेमाने, काकू दुपारी झोपली असताना तिच्या कानात केरसुणीचे टोक घालून तिची झोपमोड केली, परिणामी हेमाच्या काकूने हेमाच्या कानाखाली त्याचे पडसाद उठवले. पुढे हेमा मोठी झाली पण झाला प्रकार विसरली नाही, पण काही प्रसंगामुळे तिला पश्चात्ताप होऊन पुन्हा सगळे आलबेल झाले". आता यावर लिहिलेली कथा किती मोठी असावी? ५९७ पाने? पहिली १०/१२ पाने वाचूनच गरगरायला झाले. वाचकांना जर ती लेखिका भेटली असती तर त्यांनीही हेमाच्या काकू प्रमाणे प्रतिसाद दिला असता. असो, हा प्रकारही आपल्याला जमणार नाही असा शरणागतीचा सूर उमटला.

रहस्यमय कथा लिहावी तर तिथे शेरलॉक होम्स, ऍगाथा ख्रिस्ती, काळा पहाड, फास्टर फेणे अशा देशी विदेशी गुप्तहेरांपुढे माझा शिकाऊ उमेदवार अगदीच पांडू वाटायचा. त्यांच्यासमोर माझा कसा टिकाव लागणार? तो नादही सोडून दिला. प्रेमकथांचा तर चित्रपट वाल्यांनी चावूनचावून अगदी चोथा केलेला आहे.

कौटुंबिक कथा हा सर्वात जास्त खपणारा माल आहे असे मला संशोधनाअंती आढळून आले. लिहायलाही सोप्या. बाकीचे लेखनप्रकार जर निरनिराळ्या कोरीवकाम केलेल्या मूर्ती असतील तर कौटुंबिक कथा म्हणजे साच्याचे गणपतीच. जास्त विचार करायचा नाही, साच्यात घातली की कथा तयार. कौटुंबिक कथांमध्ये एक भलेमोठे कुटुंब असते. सर्वगुणसंपन्न अशी सून असते. खलनायिकेचे वेगळे पात्र असेल तर ठीक, नाहीतर सासू ते काम करू शकते. सासू चांगली हवी असेल तर मात्र, नणंद, भावजय अशा सहाय्यक खलनायिका हुडकाव्या लागतात. दुष्ट पात्र शक्यतो महिलावर्गातले असावे, पुरूषपात्र तितके परिणामकारक वाटत नाही. सर्वगुणसंपन्न नायिका आणि सर्वावगुणसंपन्न (सर्व+अवगुण+संपन्न) खलनायिका यांच्या जोडीला प्रेमळ सासरे, कर्तबगार नवरा, चहाडखोर शेजारीण वगैरे पात्रे असतात. अगदी बारकाईने अभ्यास करून मी ही एक कौटुंबिक कथा लिहिली. ती घेऊन एका समीक्षकाच्या घरी गेलो असता त्यांच्या ७० वर्षीय मातोश्रींनी, ही कथा जशीच्या तशी, अमुक वाहिनीवरच्या तमुक मालिकेत येऊन गेली आहे असे सांगितले. याशिवाय सर्व कौटुंबिक कथांयोग्य मालमसाला आता वापरून झाला आहे अशीही बातमी दिली. हाय रे दुर्दैव! इथेही आपला निभाव लागणार नाही हे स्पष्ट झाले.

हे जमणार नाही, ते जमणार नाही असे काट मारता मारता यादी कधी संपली ते कळलेच नाही. आपली साहित्यिक बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणे शक्य नाही या विचाराने मला अपार खिन्नता आली. मी उदास चेहऱ्याने गेल्या काही दिवसात जमा केलेला तो पुस्तकाचा ढीग पहात होतो. अचानक माझी नजर "स्वयंरोजगार" या पुस्तकावर पडली.

पुन्हा नव्या उमेदीने एका नव्या दिवसाची सुरुवात केली,
"साहित्य रद्दी भांडार, इथे सर्व प्रकारची पुस्तके रद्दीच्या भावात घेतली व विकली जातील".

समाप्त

शशांक जोशी


This article was first published on www.manogat.com and can be seen here.
Get the PDF file of part 1 and 2 together
.

माझी साहित्यविषयक महत्त्वाकांक्षा - भाग १

मोठमोठ्या लोकांचे निरीक्षण करणे हा नेहमीच माझा छंद राहिला आहे. त्यांच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे माझे अगदी बारीक लक्ष असते. आजकाल त्यांच्या एका गोष्टीवर माझे लक्ष खिळून राहिले आहे. ही मोठी माणसे सतत कशा ना कशाचा तरी आढावा घेत असतात. आज ह्याचा आढावा घेऊ, उद्या त्याचा घेऊ. त्यांचे कोणतेही महत्त्वाचे वाक्य साधारणतः "याचा जर व्यापकदृष्टीने आढावा घेतला तर..." असे सुरू होते.

आढावा हा शब्द ऐकला की सुरुवातीला मला खूप हसू यायचे. कदाचित "गाढवा" या माझ्या बालपणीच्या संबोधनाशी यमक जुळत असल्याने असेल. मी ही ठरवले आपणही घ्यायचा आढावा.

१०० वर्षे आयुर्मान धरले तर एक चतुर्थांश आयुष्य आधीचेच निघून गेलेले आहे. या कालावधीत असे काहीही केले नाही की ज्यामुळे आपल्यापश्चात जनता आपले नाव काढेल. काहीजण/जणी काढतील म्हणा "आगाऊच होता मेला, बरं झालं गेला", पण त्यात काही अर्थ नाही. "काहीतरी केले पाहिजे" या विचाराने माझी झोप उडवली होती. "काय करावे म्हणजे जगात आपले नाव निदान काही वर्षे तरी राहील?". बराच विचार केल्यावर असा निष्कर्ष निघाला की जगात प्रतिष्ठा काय ती राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक आणि साहित्यिक यांनाच मिळते. माझ्या आर्थिक, सामाजिक आणि बौद्धिक मर्यादांचा विचार केला असता अनुक्रमे राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता आणि वैज्ञानिक होणे शक्य नाही हे कठोर सत्य पुढे आले. राहता राहिले साहित्यिक. आता साहित्यिक बनणे हा एकच उपाय दिसत होता.

साहित्यातही गद्य आणि पद्य असे दोन प्रकार असतात असे शाळेत कधीतरी ऐकलेले आयतेच कामी आले. पण त्यातून नवीनच प्रश्न निर्माण झाला, सुरुवात कशापासून करायची? पद्य की गद्य? झटपट प्रसिद्धीसाठी पद्य बरे असा सुज्ञ विचार करून मी कवी व्हायचे ठरवले. प्रयत्ने वाळूचे कण रगडले तर तेलही गळते म्हणतात तर मी प्रयत्नपूर्वक लेखणीने कागद रगडले तर कविताही पाझरतील. माझा आत्मविश्वास जणू ओसंडून वहात होता. पण "पेपरमध्ये लिहिण्यापूर्वी त्याविषयाचे थोडेफार वाचन, आवश्यक नसले तरी, केले असल्यास बऱ्याचदा उपयोगी पडते. काय लिहावे? याचा फार विचार करावा लागत नाही", हे महाविद्यालयीन जीवनातले व्यावहारिक शहाणपण कामास आले. सुप्रसिद्ध कविंच्या रचना वाचायला सुरूवात केली. ह्याची कल्पना, त्याचा विचार, अमक्याचे शब्द, तमक्याचे आणखी काही अशी उचलेगिरी करून चांगल्या डझनभर कविता लिहिल्या आणि तथाकथित जाणकार लोकांना अभिप्रायार्थ दिल्या. पण हाय रे दुर्दैव! त्यांनी "अतिशय टाकाऊ", "हलक्या दर्जाच्या" "उथळ" "अर्थशून्य" अश्या शाब्दिक बाणांनी माझ्या कोवळ्या प्रतिभेचा भीष्म पितामह करून टाकला.

साहित्याच्या कारकिर्दीच्या सुरूवातीलाच असा झटका लागल्याने, माझी भारतीय क्रिकेट संघासारखी दारूण अवस्था झाली. एकंदर हा प्रकार दिसतो तितका सोपा नाही हे कळून चुकले. मी झाल्या प्रकाराचे त्रयस्थपणे विच्छेदन करायचे ठरवले. रात्र रात्र जागून, जाणकार लोकांचे इतर कविंना मिळालेले अभिप्राय वाचले. चांगले अभिप्राय मिळालेल्या कवितांचे असंख्यवेळा वाचन केले. अर्थबोध न होणाऱ्या कवितांची घसा कोरडा पडेपर्यंत स्तुती केली. साध्या, सोप्या आणि अर्थ समजणाऱ्या कवितांना, "खोली नाही" "जीवनाचा साक्षात्कार झाल्याची प्रतीती येत नाही" असे अभिप्राय दिले. मतला, मक्ता, जमीन, छंद-वृत्तांची नावे या शब्दांचा अर्थ माहित नसतानाही मुबलक वापर सुरू केला. इतकेच नव्हे तर "अर्थगहन" कवितांसाठी प्रसिद्ध अशा एका कविवर्याची कवितांची वहीदेखील मिळवली. भल्या पहाटे उठून अतिशय आदरपूर्वक त्या वहीचे वाचन सुरू केले. पहिले पान उघडले,

तुझे कान
माझे कान
जवळ आले तर
किती छान?

आता दोन माणसांचे कान एकमेकांजवळ कशाला येतील? जर तोंड कानाजवळ आले तर काही बातम्या इकडून तिकडे जातील. पण कान जवळ येऊन काय होणार आहे? एका कानातला मळ थोडीच दुसऱ्या कानात जाणार आहे? फारतर कानाच्या निमित्ताने डोकी जवळ आल्याने 'लाईसिल' च्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे इकडच्या उवा तिकडे असे बेकायदेशीर स्थलांतर होईल. मला तर काहीच अर्थ लागेना. पुढे तीन प्रसिद्ध समीक्षकांच्या अभिप्रायाची, अनुक्रमे ३, ७ आणि ९ पानी समीक्षेची कात्रणे चिकटवली होती. त्यामध्ये काय काय लिहिले होते विचारू नका, "शब्दरूपी कामधेनूचे दोहन करून कवीने अर्थरूपी अमृताचा जणू महासागरच निर्माण केला आहे", "शब्दरूपी मेघातून बरसणाऱ्या अर्थरूपी थेंबानी, वाचकांच्या कल्पनाशक्तीच्या हिरवळीला चालना दिली आहे" असे काहीबाही त्यात लिहिले होते. हे समीक्षक लोक इतके जाडजूड शब्द का वापरतात कळत नाही. चुकून एखाद्या वाक्याचा अर्थ लागला तर यांची बायको यांना जेवायला देत नाही की काय कोण जाणे? असो मी पुढचे पान उलटले,

तुझी मान
माझी मान
काळी काळी
गोरी पान

घ्या! इतकी टाकाऊ रचना मी कधीही वाचली नव्हती. चार वर्षाच्या पोरालाही ऐकवली असती तर "काय येडं आहे" असा अभिप्राय आला असता. बस झाले पुढे असलेली ७, ९ आणि ११ पानी समीक्षा वाचण्याचे धाडस झाले नाही. "कवी बनायला नको" असा असा अंतर्ध्वनी उमटला. मी नेहमीच ऐकतो तो. अतिशय जड मनाने मी कवी बनण्याच्या इच्छेचा त्याग करून लेखक बनण्याचा निर्णय घेतला.

क्रमश:

शशांक जोशी


This article was first published on www.manogat.com and can be seen here.
.